मुंबई : मान्सून अखेर राज्यात येऊन ठेपला असल्याने बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा संपली आहे. पाऊस म्हणजे निसर्गाचा असा आविष्कार, की जो मनामनांवर आनंदाचे अधिराज्य गाजवतो. मोठी माणसे जिथे पावसाच्या आगमनाने प्रफुल्लित होतात, तिथे लहान मुलांची तर गोष्टच न्यारी. आनंद त्यांच्या प्रत्येक हालचालीतून जणू थुईथुई नाचत असतो. चातक पक्षी आणि निसर्गातील प्रत्येक घटक जसा पावसाची वाट पाहतो, तशीत लहान मुलेही मनसोक्त हुंदडण्यासाठी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असतात. मुलांचा हा आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतो. मुंबईतील काही लहानग्यांनी आपला आनंद व्यक्त करण्याला विधायक रूप दिले.
समाजप्रबोधनासाठी जागृत असणाऱ्या काही बालचित्रकारांनी वेगळे विषय घेऊन छत्र्या रंगवल्या. मुंबईतील ‘गुरुकुल स्कूल ऑफ आर्ट’चे सागर कांबळी यांनी ही माहिती दिली. पाऊस म्हटला, की प्रथम आठवण येते बळीराजाची. या पावसामुळे तरी बळीराजाचे दुःख बरे व्हावे, असा संदेश काही बालचित्रकारांनी छत्र्यांतून दिला. ‘स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई,’ ‘झाडे तोडू नका, झाडे लावा, मुंबईला वाचवा’ असे अनेक संदेश या बालचित्रकारांनी छत्र्यांवर रेखाटले. या छत्र्या हीच मुले वापरत असल्याने यातून कित्येक लोकांपर्यंत आपोआप चांगले संदेश पोहोचवणार आहेत, असेही कांबळी यांनी स्पष्ट केले.